कृतेतु मारुताख्यश्च, त्रेतायां पवनात्मज । द्वापारे भीमसंज्ञश्च, रामदास: कलौ युगे ।
कृतयुगातला मारुती, त्रेतायुगातला पवनात्मज, द्वापारातला भीम आणि कलियुगात रामदास या नावाने हनुमंत जन्म घेईल असं सांगणारा भविष्योत्तर पुराणातील हा श्लोक! प्रत्येक युगातल्या या मारुती अवताराचं व्यवच्छेदक लक्षण काय असावं हे सांगणारा!
कृतयुगातल्या मारुतीने, पवनात्मज या रूपाने त्रेतायुगात जन्म घेतला. त्रेतायुग म्हणजे रामावताराचं युग... रामाच्या हृदयस्थ असलेला त्याचा अनन्य भक्त पवनात्मज हा होता. वायूचा पुत्र असल्याने अत्यंत चापल्य हा त्याचा व्यवच्छेदक गुण! ‘मनासी टाकिले मागे, गतीसी तुलना नसे’ अशी त्याची गती! आणि ‘कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे’ अशी त्याची झेप! पवनात्मज या नावाला अत्यंत साजेशी...
द्वापार युगातील मारुती अवतार म्हणजे भीम! बलदंड शरीर, अधर्माविषयी अत्यंत क्रोध आणि त्या अधर्मी, अत्याचारी व्यक्तीचा समाचार घेण्यासाठी सदा सज्ज गदा म्हणजे भीम!
समर्थ म्हणतात,
चळचळीतसे लीळा प्रचंड भीम आगळा
त्यजूनि सूर्यमंडळा नभांत भीम आगळा
याच्यासारखा वीर सूर्यमंडळात अन्य नाही...
म्हणून खलनिर्दालन आणि त्याकरिता गाजवलेला महापराक्रम हे द्वापारातल्या भीमाचं व्यवच्छेदक लक्षण..
आणि आता कलियुगातील रामदास!
पूर्वअवतारातील पवनात्मजाप्रमाणे अखंड भ्रमण, चिंतन आणि भीमाप्रमाणे कालानुरूप शस्त्रसामर्थ्य आणि शक्तीचा पुरस्कार... असं समर्थ संपन्न सामर्थ्योपासक व्यक्तिमत्त्व!
याखेरीज रामभक्तीची अनन्यता आणि कठोर ब्रह्मचर्य हे मारुतीचे सर्वोपरी असणारे गुण समर्थांच्या व्यक्तिमत्त्वातही अग्रभागी होते.
देवाच्या सख्यत्वासाठी
पडाव्या जिवलगांसी तुटी
सर्वस्व अर्पावे शेवटी
प्राण तोही वेचावा
असं म्हणणारी निष्ठावंत दास्यभक्ती होती. आणि ही भक्ती प्रकट करणारा कारुण्याचा अखंड प्रवाही झराही हृदयात खळाळत होता. तेजस्वी वाणी आणि प्रभावी लेखणी होती, म्हणूनच समर्थांचं वाङ्मयीन व्यक्तिमत्त्व मारुतीप्रमाणेच बुद्धिमतां वरिष्ठम् असं होतं.
स्वधामासी जाता प्रभू रामराजा
हनुमंत तो ठेविला याच काजा
सदासर्वदा रामदासासी पावे
खळी गांजिता ध्यान सोडून धावें...
रामराजाने स्वधामाला जाताना हनुमंताला मागे ठेवलं... चिरंजीवपद दिलं... रामदास्य करणाऱ्या सर्वांची चिंता त्याच्यावर सोपविली. हा श्लोक समर्थांनी लिहिला इतकंच नाही. तर स्वतःसहित या सर्व हनुमंत अवतारांचं प्रयोजनच आपल्याला सांगितलं.
तुम्हां आम्हां सर्वांसाठी अखंड ध्यानात असलेला मारुती धावत येतो... हे शब्दच किती आश्वस्त करणारे...
अशीच एक संजीवनी घेऊन तू आजही येशील... निश्चित येशील...
- डॉ. सौ. अपर्णा अजित बेडेकर